* राजगुरु श्रीसिद्धेश्वर बुवा महाराज ह्यांची माहिती *

      मराठी संस्कृतीच्या जपणूक करणार्‍या यादव साम्राज्यातील वेरुळच्या उत्तरेस आठ कोसावर ‘निधोन बावरे’ नांवाचे एक खेडेगांव आहे. त्या खेडेगांवात कृष्णात्री गोत्राचे रामभटबाबा नावाचे एक सात्त्विक ब्राह्मण राहात होते. त्यांच्याकडे अंतूर व फलंबरी ह्या दोन गांवचे पौराहित्यकर्म होते. रामभटबाबा हे वेदशास्त्र संपन्न सात्त्विक ब्राह्मण असून त्यांचा व्यवसाय जरी ज्योतिषाचा असला तरी त्यांचा स्वभाव निर्लोभी होता. श्रीप्रभू रामचंद्र हे त्यांचे आराध्य दैवत. स्नानसंध्या, पूजा-अर्चा, नामस्मरण, ध्यानधारणा अशा गोष्टींमध्ये ते सगळा दिवस व्यथित करत. त्यांच्या धर्मपत्नीचे नांव गोदावरी होते. पतिसेवा, ईश्वरभक्ती, हरिचिंतन व नामस्मरण ह्यांमध्ये त्या सदैव व्यग्र असत. अत्यंत समाधानी अशा त्या थोर पतिव्रता होत्या. 
      श्री रामभटांना ज्योतिषशास्त्राचा उत्तम अभ्यास अवगत होता. त्यामुळे ज्योतिषांच्या निमित्ताने त्यांच्या घरी लोकांची अहर्निश वर्दळ होती. त्यांना जो पहिला मुलगा होता, त्याचे नांव हरिभट. त्याचा विवाह झाला होता. त्याची पत्नी अर्थात रामभटांची सून जबाबदार गृहिणी होती. 
      श्रीरामभट व गोदाताईंना आताशा संसारातील व्यथा बाजूला ठेवून अध्यात्मिक सुख व शांतता अनुभवायची होती. कुठं तरी दूर एकांत स्थळी जावून स्वसाधना करायची होती, ईश्वरचरणी एकाग्र व्हायचे होते. ह्यासाठी त्यांनी आपला मुलगा हरिभट व सुनेवर प्रपंचाचा भार सोपवून एके दिवशी सुमुहूर्तावर आवश्यक तेवढे साहित्य घेवून घराचा निरोप घेतला. 
      मजल दरमजल प्रवास करीत ते कोकणात सागर किनारी असलेल्या हरिहरेश्वरला पोहचले. हरिहरेश्वर हे अत्यंत प्रखर जागृत देवस्थान असून, समुद्रकिनारी वसलेले हे ठिकाण अत्यंत रम्य. रामभटबाबांना ह्या रम्य ठिकाणी पाहिजे तसा एकांतवास मिळाला. हरिहरेश्वराच्या पाठीमागे भैरवनाथाचे मंदिर होते. ब्राह्ममुहूर्तावर उठून स्नानसंध्या आटोपून हरिहरेश्वराची व भैरवनाथाची पूजाअर्चा, वाचन, जप, नामस्मरण, त्रिकाल स्नानसंध्या ह्यात त्यांचा सर्व दिवस जाऊ लागला. होता होता एक तपाचा (बारा वर्षाचा) काळ त्यांनी श्रीहरिहरेश्वर व भैरवनाथ ह्यांच्या सेवेत अत्यंत आनंदाने व्यतीत केला. त्यांच्या ह्या तपाचे फळ त्यांना लवकरच मिळाले. श्रीहरिहरेश्वराने स्वप्नात दृष्टांत दिला व आदेश दिला की, “तुमचे येथील कार्य झालेलं आहे. तुम्ही प्रसन्न चित्ताने घरी जा! तुम्हा उभयतांची पूजा, अर्चा व सेवा आमच्या चरणी रुजू झालेली आहे. तुमचे कल्याण आहे!” ह्या दृष्टांताने श्रीरामभटबाबा व मातोश्री गोदावरींना अतिशय आनंद झाला. आपल्या बारा वर्षाच्या अनुष्ठानाची हरिहरेश्वराला सांगता करताना गांव जेवण घालून ते आपल्या ‘निधोन बावरे’ गांवी परत आले. ‘निधोन बावरे’ ह्या आपल्या गांवी परत आल्यावर लोकांनी, गांवकर्‍यांनी तसेच त्यांच्या पै पाहुण्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केले. त्यांच्या खडतर तपश्चर्येबद्दल धन्योद्गार काढले. श्री रामभटजी आता हळूहळू घरातील व्यवहारात व पौरोहित्यात लक्ष घालू लागले. लवकरच बारा वर्षाच्या तपश्चर्येनंतर त्यांना शालिवाहन शके 1665 मध्ये प्रमोदीनाम संवत्सरात आणि वसंत ऋतू, चैत्र शुद्ध पक्षी, श्रीराम नवमी, पुनर्वसु नक्षत्र, अतिगंड योग, तैतील करण, मिथुन लग्नी, माध्यान्ह समयी अशा योगावर एका बालकाने त्यांच्या पोटी जन्म घेतला. श्री. रामभटबाबांनी व सौ. गोदावरींनी आपल्या ह्या दिव्य बालकाचे नांव ‘सिद्धेश्वर’ ठेवले. सिद्धेश्वरानंतर रामभटांना व गोदावरींना पुढे कन्या झाल्या. अशा रितीने रामभटांना एकूण दोन मुले व पाच मुली झाल्या. त्यांचे घर जणू गोकूळच झाले.
      धर्मशास्त्राप्रमाणे बाल सिद्धेश्वरांचा व्रतबंध झाल्यानंतर लगोलगच तत्कालीन परिस्थितीनुसार लहानपणीच त्यांचा विवाहदेखील झाला. त्यानंतर त्या लहान वयात म्हणजेच वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षी वेद अध्ययनासाठी ते घर सोडून छ. संभाजीनगरला (पूर्वीच्या औरंगाबादला) नाना शास्त्री नावांच्या प्रख्यात पंडितांकडे आले. सिद्धेश्वर हे कुशाग्र बुद्धीचे एकपाठी होते. विरक्त, शांत, समाधानी तसेच ईश्वरभक्तीत रममाण होणारा असा त्यांचा स्वभाव होता. तथापि लगोलगच त्यांची पत्नी वारल्याने त्यांना परत गांवी परतावे लागले. आता त्यांचा संसाराचा धागा तुटला होता. मन विषण्ण झाले होते. छ. संभाजीनगरमधील एका धार्मिक कार्यक्रमात त्यांची गाठ कवी मनाचे, ईश्वरभक्तीत सदैव रममाण झालेल्या व महान भगवद्भक्त असे थोर संत श्रीअमृतराय ह्यांच्याशी पडली. श्रीसंत अमृतरायांच्याबरोबर श्रीसिद्धेश्वर हे त्यांच्या श्रीक्षेत्र पैठण गांवी गेले. श्रीअमृतरायांनी श्रीसिद्धेश्वरांचा शिष्य म्हणून स्वीकार केला. श्रीसिद्धेश्वरांना मनासारखा गुरु मिळाला व श्रीअमृतरायांनाही शिष्योत्तम मिळाला. लवकरच वेद अध्ययन, ईश्वरप्राप्ती बोध संथा पूर्ण करुन श्रीसिद्धेश्वर हे आपल्या गांवी परतले.
      आता श्रीरामभटजी व सौ. गोदावरी आई वृद्ध झाले होते. परंपरेने आलेले गांवचे जोशीपण त्यांनी श्रीसिद्धेश्वराकडे सोपविले व अपुरा संसार पुन्हा पूर्ण करणेस सांगितले. निधोन बावरे गांवापासून अकरा कोस असलेल्या ‘सुरंगली’ गांवच्या गंगाधरपंत व सौ.लक्ष्मीबाई पाटील ह्यांची कन्या भवानीबाई ह्यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. अशाप्रकारे श्रीसिद्धेश्वरांना पुन्हा एकदा प्रपंचात येणे प्राप्त झाले. श्रीसिद्धेश्वर जरी प्रपंचात पडले होते तरी त्यांच्या वृत्तीत व कृतीत यत्किंचितही फरक पडला नव्हता. ते विरक्तच होते. स्नान, संध्या, ईश्वरचिंतन व वेदाभ्यास ह्यामध्ये त्यांचा खंड पडला नव्हता. लवकरच त्यांचे पिताश्री श्रीरामभटबाबा वारले. त्यांच्या आई गोदावरीमातेना अतीव दु:ख झाले. वडिलांचे वर्षश्राद्ध होताच मनाच्या चित्तशांतीसाठी श्रीसिद्धेश्वर निधोन बावरे येथील घरदार सोडून सोडून पैठणला आले. त्यांनी आपले गुरु श्रीसंत अमृतराय ह्यांचा आशीर्वाद व सहवास साधला. श्रीअमृतरायांच्या आदेशाने श्रीसिद्धेश्वर पुढील साधना, विद्या अध्ययनासाठी श्रीक्षेत्र काशीला आले. श्रीकाशी क्षेत्री राहणार्‍या श्रीअमृतराय ह्यांचे गुरुबंधू अद्वैतानंद स्वामी ह्यांच्या आश्रमात राहून पुढील विद्येचे अध्ययन केले. योगाभ्यास पूर्ण केला. श्रीस्वामी अद्वैतानंदाच्या कृपेने श्रीसिद्धेश्वरांना मनोबल, तपोबल, समाधान प्राप्त झाले. त्यांना समदृष्टी साधली. चित्कला प्राप्त झाली, परमानंद प्राप्त झाला, आत्मशांती लाभली. भावसमाधीचा आनंद लाभला. श्रीस्वामी अद्वैतानंदाच्या सहवासात दोन वर्षाचा काल व्यतीत करून त्यांच्या आशीर्वादाने ते धन्य झाले. श्रीस्वामी अद्वैतानंदानी गंगा किनारी समाधी घेतल्यावर ते तीर्थस्थळे हिंडत फिरत, हिमालय पर्वतातील पवित्रस्थलांचे दर्शन घेवून, अनेक साधू संन्याशी, योगी, अवतारी पुरुष ह्यांच्या सहवासात कांही दिवस घालवून ते तुळजापूरला आले. बरेच दिवस तेथे त्यांनी मुक्काम केला. तेथून सातारा मार्गे कराडला आले. कृष्णा-कोयना संगमात स्नान करुन कृष्णा नदीच्या काठाने प्रवास करीत ते ‘श्रीक्षेत्र नृसिंहपूर’ ह्या त्यांच्या मनाजोग्या निवांत स्थळी आले. हे पवित्र स्थळ म्हणजे श्रीभगवान लक्ष्मीनृसिंहाचे स्थान. षोडषभूजा नरसिंहदेवाची अखंड शाळीग्रामाची पुरुषभर उंचीची भव्य मूर्ती. श्रीनृसिंहमंदिर हेमाडपंती पद्धतीने बांधलेले आहे. मूर्ती भुयारात आहे. श्रीसिद्धेश्वरांना हे स्थान फार आवडले. ध्यान-धारणेसाठी हवा असणारा एकांतवास, समोरून संथ वाहणारी कृष्णामाई ह्यामुळे श्रीसिद्धेश्वरांनी श्रीक्षेत्र नरसिंहपूर ही आपली तपोभूमी, कर्मभूमी मानली. तेथेच त्यांनी ध्यान-धारणा, योगसाधना सुरू ठेवली. केवळ जनकल्याणार्थ जन्म घेतलेल्या ईश्वरी अंशाच्या श्रीसिद्धेश्वरांची कीर्ती आसपासच्या पंचक्रोशीत पसरली. त्यांच्या दर्शनाला लोकांची, भाविकांची, आर्ताची गर्दी होऊ लागली.
      राधाबाई व्यास, मुरारीभट व्यास, काब्रस सावकार, आलास गांवचे कुलकर्णी व त्यांची पत्नी भीमाबाई, कराड कोळ्याची वेणुताई गुणे, वेणुताईचा उपाध्याय महादेव भट अशी बरीच मंडळी श्रीसिद्धेश्वरांची शिष्य झाली. श्रीनरसिंहपूरच्या पूर्वेस असलेल्या ‘शिरटे’ गांवाजवळ असलेल्या श्रीपशुपतीनाथ मंदिरात श्रीसिद्धेश्वरांनी एकांतवास करून ईश्वरचिंतनात, नामस्मरणात, जप-तपात आपला नित्यक्रम चालवू लागले. शिरटेच्या पशुपतिनाथ मंदिरापासून जवळ असलेल्या कापूसखेड गांवातील काशीपंत कुलकर्णी, कर्‍हाडचे मोरोपंत पेंढारकर, रेठरेच्या माधवराव रेठरेकर, त्र्यंबकराव रेठरेकर बंधू आदी मंडळी त्यांची शिष्य झाली.
      श्रीनृसिंहपूर, शिरटे पशुपतिनाथ व आसपास भागात 11 वर्षांचा काळ तपसाधनेत घालवून श्रीसिद्धेश्वर आपल्या जन्मगांवी पुन्हा एकदा जाणेसाठी निघाले. कराड, पंढरपूर, सोलापूर, नगर, नाशिक करुन ते छ. संभाजीनगरला आले. आता वृद्ध झालेल्या श्रीसंत अमृतरायना भेटून त्यांचा आशीर्वाद घेवून आपल्या ‘निधोन बावरे’ गांवी आले. गांवात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. घरी आल्यावर त्यांचे थोरले बंधू, भावजय ह्यांना फारच आनंद झाला. परंतु श्रीसिद्धेश्वरांनी घर सोडल्यावर त्यांच्या मातोश्री गोदावरी ह्या त्यांना शोधायला बाहेर पडल्या त्या पडल्याच. सगळी तीर्थक्षेत्रे, मंदिरे, गिरीकंदरे मातोश्री गोदावरींनी पालथी घातली. परंतु श्रीसिद्धेश्वरांचा शोध त्यांना लागला नाही. परंतु गांवातील पूर्ण वाचासिद्धी असलेला जमालशहा फकिराने त्यांना सांगितले की “श्रीसिद्धेश्वर तुला येवून भेटेल तो योगी आहे. काळजी करु नकोस. उडीदडाळ कालवण व भाकरी मला वाढ. लवकरच तो येईल” रखम भटजींना मातोश्री गोदावरींच्या ठावठिकाण्याची माहिती होती. श्रीसिद्धेश्वरांच्या आज्ञेने रखम भटजी करवीर क्षेत्री श्रीअंबाबाईच्या मंदिरात आले. त्यांनी मातोश्री गोदावरींची भेट घेतली व श्रीसिद्धेश्वर बावर्‍याला आल्याचे सांगितले. मातोश्रींनी श्रीअंबाबाईची भरल्या डोळ्यांनी पूजा बांधून नवस पूर्ण करुन रखम भटजीबरोबर बावर्‍याला आल्या. वृद्धत्वाने थकलेल्या आईची गाठ पडल्याने श्रीसिद्धेश्वरांना अतिशय आनंद झाला. घर गोकुळ झाले. श्रीसिद्धेश्वर ईश्वर शोधात, गुरु शोधात बाहेर पडल्यावर त्यांची मंडळी सौ. भवानीबाई ह्या त्यांच्या माहेर सुरगंली (कळंबसर) येथे जावून राहिली होती. त्याही बावर्‍याला परत आल्या. आपल्या मातोश्री गोदावरी व पत्नी भवानीबाई ह्यांना घेवून श्रीसिद्धेश्वर नरसिंहपूरात आले व त्यांची राहण्याची व्यवस्था केली. सर्व लोक, भक्तमंडळी श्रीसिद्धेश्वरांना गुरु मानून ‘श्रीगुरुबुवा महाराज’ असे संबोधत. त्यांचा सर्वकाळ ईश्वर चिंतनात जात असे. काबरस सावकार, सिन्नाप्पा, हरभट रेणावीकर, महादेवशास्त्री, विनायक भट, मुकूंदपंत असे भक्त श्रीसिद्धेश्वर आश्रमाची व्यवस्था पाहात होती. श्रीसिद्धेश्वर स्वामींचा वाडा म्हणजे ‘हे विश्वची माझे घर’ झाले होते. त्यांचा सर्व वेळ तपसाधनेत, भक्तांना मागदर्शन करण्यात आनंदाने जात होता. आता जनसंपर्क वाढतच चालला होता. त्यामुळे श्रीसिद्धेश्वर स्वामींच्या साधनेत अडथळा येत चालला होता. त्यामुळे त्यांनी मौन धरले.
      त्याच काळामध्ये ‘दीनांचे आश्रयदाते व श्रीभक्तांचे कनवाळू’ अशी कीर्ती ऐकून एक मध्यम वर्गीय घरातील गृहस्थ बाजीपंत श्रीसिद्धेश्वर स्वामींच्या दर्शनाला आला. श्रीस्वामींच्या दर्शनाने तो सुखावला. त्यांच्या सेवेत तो रमला. श्रीस्वामींच्या कृपेने त्याचा भाग्योदय झाला. त्यावेळी करवीरप्रांती श्रीशिवछत्रपती राजे व त्यांच्या मातोश्री जिजाबाईसाहेब ह्यांच्या आज्ञेने येसाजी शिंदे हे सर्व राज्य कारभार पहात होते. येसाजी शिंदे हे खूपच चाणाक्ष व राजकारण धुरंधर होते. ते अत्यंत व्यवहार कुशल होते. माणसांची अचूक पारख त्यांना होती. योगायोगाने श्रीस्वामी कृपेने बाजीपंत येसाजी शिंदेकडे कामानिमित्त आले. दारिद्रयाने गांजलेल्या बाजीपंतातील ‘कामाचा प्रामाणिक माणूस’ त्यांती हेरला व त्यांना आपला कारभारी म्हणून आपल्या पदरी नोकरी दिली. श्रीस्वामी कृपेने व श्रीगुरुकृपेने बाजीपंतांना सोन्याचे दिवस आले. येसाजी शिंदे ह्या आपल्या धन्याची बाजीपंताने प्रामाणिकपणे घरचा माणूस म्हणून सेवा केली. एका व्याधीतून पोटदुखीतून बरे व्हायला मदत केली. ह्याच बाजीपंताने आपले धनी येसाजी शिंदे ह्यांना आपले गुरु श्रीसिद्धेश्वर स्वामींच्या दर्शनाला येता यावे तसेच त्यांना श्रीगुरुंचे दर्शन व्हावे ह्या हेतूने व्यंकटराव सबनीस, आण्णाचार्य ह्यांच्या मदतीने श्रीसिद्धेश्वर स्वामींना विनंती करुन नरसिंहपूरहून करवीरला आणले. येसाजी शिंदेना फार आनंद झाला. सर्वांनी श्रीसिद्धेश्वर स्वामींची शोभायात्रा काढली. श्रीस्वामींची सबनीस वाड्यात चोख व्यवस्था ठेवली. येसाजी रोज तिन्ही त्रिकाळ दर्शनास जाऊ लागले. त्यांचाही भाग्योदय श्रीस्वामी दर्शनाने झाला.
      त्याकाळी श्रीमंत महाराज शिवछत्रपती हे करवीरचे राजे त्यांचा मुक्काम पन्हाळगडावर असून तेथून ते कोल्हापूरची गादी व राज्यकारभार चालवीत होते. एकदा त्यांच्या पाठीवर पुटकुळी उठली व दुखू लागली. हळूहळू त्या पुटकुळीचा आकार वाढतच चालला. सर्व पाठ लाल झाली. असह्य वेदना चालू झाल्या. रात्रंदिवस ते वेदनेने तळमळू लागले. राजवैद्य, वैद्य, हकीम झाले; औषधे, गुटीका, मात्रा, भस्मे झाली - परंतु गुण आला नाही. असा एक महिना गेला. पालथे झोपून सुद्धा वेदना कमी नाहीत. राजे रात्रंदिवस वेदनेने तळमळत होते. दरबारचे सर्व मानकरी, सरदार, रयतही चिंतेत पडले. दिवसें दिवस छत्रपतींचे दुखणे वाढतच चालले. फोड फुटेना, अंगास वस्त्र लागू देईना, झोप लागेना, उठून बसणे सहन होईना अशी अवस्था छत्रपतींची होवून बसली. तेही चिंताक्रांत झाले. अशाच एके दिवशी छत्रपतींना किंचित डोळा लागला होता. इतक्यात त्यांना स्वप्नात दृष्टांत झाला. सुवर्णकांती, डोईस शालनामा बांधलेले, अंगावर भरजरी शालजोडी, कासेला रेशीमकाठी धोतर, अंगावर गोपीचंदनाचे टिळे, रामनामाची मुद्रा, एका हातात पळीपंचपात्र, पायांमध्ये पादुका, गळ्यात पोवळ्यांची - स्फटिकाची माळ अशी अत्यंत तेजस्वी मूर्ती त्यांच्याजवळ आली व म्हणाली “आप्पा हे तुला काय झाले आहे? ऊठ चिंता करू नकोस, व्याकूळ होऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.” असे म्हणून त्या दिव्य मूर्तीने त्यांच्या पाठीवरुन हात फिरवला, त्यांच्या मस्तकी हात ठेवून ती मूर्ती अंतर्धान पावली. छत्रपती स्वप्नातून जागे झाले. त्यांना खूप आश्चर्य वाटले. दिवाणखान्याचा दरवाजा तर बंद होता. पाठीवरचा फोड फुटून त्यातून घाण वाहून गेली होती. वेदना कमी होत चालल्या होत्या. छत्रपतींना परम संतोष झाला होता. स्वप्नातील ‘आप्पा’ ही हाक त्यांच्या हृदयात बसली होती. श्रीस्वामींचे सोज्वळ रुप त्यांच्या डोळ्यात बसले होते. पण हे दिव्य पुरुष स्वामी कोण? हे त्यांच्या मनात घोळत होते.
      छत्रपती ह्या मोठ्या व्याधीतून मुक्त झाले. ह्याचा सर्वांना आनंद झाला आणि आश्चर्यही वाटले. आता आपणास दृष्टांत देऊन कल्याण करणारे स्वामी कधी भेटतील ह्याचा ध्यासच छत्रपतींना लागला. ह्याच वेळी कारभारी येसाजी शिंदेनी, बाजीपंतांनी छत्रपतींना सबनीस वाड्यात वास्तव्याला आणलेल्या आपले गुरु श्रीसिद्धेश्वर स्वामींच्या दर्शनाला आणले. स्वप्नात ज्या दिव्य विभुतीने दर्शन दिले. पाठीवरुन हात फिरवला. ज्या हस्तस्पर्शाने पाठीवरील फोड-गळू फुटला होता व वेदना नाहीशा झाल्या होत्या त्या दिव्य त्रिमूर्तींना छत्रपतींनी ओळखले व त्यांचे दिव्य चरण धरले. श्रीसिद्धेश्वर स्वामींना साष्टांग नमस्कार घातला. श्रीसिद्धेश्वर स्वामींनी त्यांना उठवले व म्हणाले “आप्पा, सुखरूप आहेस काय?” “आप्पा” ही श्रीगुरुंची वाणी ऐकून छत्रपतींच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वप्नातील दृष्टांतातील ती हाक व ही हाक एकच होती. हेच ते आपले श्रीगुरु हे छत्रपतींनी ओळखले. श्रीसिद्धेश्वर स्वामी महाराज ह्यांचे ते शिष्य झाले. श्रीसिद्धेश्वर स्वामी महाराज आता करवीर संस्थानचे राजगुरु झाले. लवकरच छत्रपतींनी श्रीसिद्धेश्वर स्वामी महाराजांच्या समस्त परिवाराला नरसिंहपूरहून करवीरला आणून त्यांच्या पायी आपली निष्ठा, श्रद्धा, धन अर्पण केले. छत्रपतींच्या परिवारातील राजघराण्यातील सर्वांनी श्रीसिद्धेश्वर स्वामींना गुरु करून घेतले, त्यांचा अनुग्रह घेतला. छत्रपतींच्या करवीरवासियांच्या सर्व सुख-दुःखात श्रीसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी मार्गदर्शन केले, आशीर्वाद दिला, राज्य राखले, सुखी ठेवले.
      ह्यानंतर अनेकांचा उद्धार करुन तीर्थक्षेत्र नाशिक, अनेक महत्त्वाची तीर्थक्षेत्रे आपल्या परिवारासह प्रवास केला व परत कोल्हापूरला आले व राजघराण्याचे गुरु म्हणून वास्तव्यास राहिले. श्रीअंबाबाई दर्शन करीत, साधना-तप करीत राहिले. श्रीछत्रपती त्यांचे आज्ञेनुरुप वागत, सदैव श्रीस्वामी सेवेत रहात. अशा प्रकारे राजे श्रीगुरु सेवा करीत. छत्रपतींना यश, संपदा, लढाईत जय मिळत गेला.
      श्रीसिद्धेश्वर गुरुमहाराज आता थकत चालले होते. ज्या कार्यासाठी त्यांनी अवतार धारण केला होता ते कार्यही संपत चालले होते. अनेक दीन दुबळ्यांना, आर्तांना, मुमुक्षांना त्यांनी ईश्वराबद्दल निष्ठा, भक्ती, प्रेम, शिकवले होते. सर्वांना भक्तिमार्ग दाखविला होता. त्यांचा संसार निष्काम कर्मयोग्याचा होता. त्यांच्या संसारात सर्व शुद्ध, सात्त्विक, पवित्र, प्रेमळच होते. त्यांची मुले बाबा महाराज, नाना महाराज, भाऊ महाराज हे अध्यात्मिक क्षेत्रात पारंगत होती. त्यांच्या दोन्ही कन्या बहिणाबाई (पती - श्री. आनंदराव आबाजीराव प्रतिनिधी, विशाळगडकर), कृष्णाबाई (पती - श्री. सदाशिवराव खंडेराव देशपांडे, कडेगांवकर) ह्या अत्यंत सात्विक होत्या; न्यूनता कांहीही नव्हती. गुरुशिष्यांचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध व परंपरा ध्यानी घेवून श्रीसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी अनेकांचा उद्धार केला होता. अनेक भक्तांची संकटे त्यांनी दूर केली होती. करवीरचे छत्रपती राजे शिवाजी ह्यांचे सर्व राजकीय, सामाजिक, अध्यात्मिक व वैयक्तिक उद्धाराची गती साधली होती. अनेक जीवमात्रांचा उद्धार करुन शके 1723 दुर्गती नाम संवत्सर, वसंत ऋतु वैशाख वद्य षष्ठी इंदुवार (इ.स.1801) रोजी श्रीसिद्धेश्वर स्वामी महाराजांनी समाधी घेतली. छत्रपतींनी त्यांची समाधी पंचगंगा घाटावर बांधून त्यांच्या पादुका स्थापन करून तेथे मंदिर बांधले. हे मंदिर 16 मे 1807 रोजी पूर्णत्वास गेले. श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज रोज शुक्रवार पेठेतून पंचगंगा नदीकाठी फिरायला जात त्यावेळी ह्याच सिद्धनाथांचे ते दर्शन घेत.

संदर्भ ग्रंथाचे नांव - श्रीगुरु सिद्धेश्वर कथामृत
लेखक - डॉ. श्री. एम. आर. कुलकर्णी
प्रकाशक :- रामचंद्र पंडित ट्रस्ट, कृष्णानगर, सातारा

परमपूज्य श्री झेंडे महाराज लिखित, ‘समुद्र भरला आहे’ ह्या ग्रंथातील लेखाच्या आधारे हा लेख संपादित केलेला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *